पुणे : पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. या पाण्याचे संवर्धन अथवा व्यवस्थापनाचा कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी पाण्याशी संबंधित अनेक पैलू समजून घेणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेत, जलस्रोताची बचत करताना जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर, तलेरा इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट्स आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या वतीने ‘नीर ध्वनी महोत्सव’ या अभिनव जागरूकता मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झालेल्या एका कार्यक्रमात या महोत्सवाची घोषणा करण्यात आली. मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा, प्रभात स्टुडिओचे विवेक दामले, इव्हॉल्व्हिंग कल्चर फाउंडेशनच्या संचालिका त्रिशला तलेरा यांबरोबरच नीर ध्वनी महोत्सवाच्या सल्लागार व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. या वेळी स्वतंत्र थिएटर यांच्या वतीने ‘जल है, तो कल है’ या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलताना त्रिशला तलेरा म्हणाल्या, ‘जल साक्षरता हा विषय हाताळताना चित्रपट आणि कला यांच्या माध्यमातून होत असलेला ‘नीर ध्वनी महोत्सव’ हा आमचा एक सर्वसमावेशी प्रयत्न आहे, असे आम्हाला वाटते. माहिती संकलित करणे, नागरिकांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधणे आणि तरुणांना या क्षेत्रात काम करण्याची उर्जा देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.’
‘या महोत्सवात भूगर्भातील पाण्याशी संबंधित अनेक बाबींवर प्रकाश टाकला जाईल; तसेच ध्वनीविज्ञानाशी संबंधित विषयांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातील. ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या विषयावरदेखील मार्गदर्शन व माहिती उपस्थितांना मिळू शकणार आहे, असे डॉ. दास यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.
‘शनिवारी, दि.२४ व रविवारी दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी हा महोत्सव होणार असून, या महोत्सवाच्या निमित्ताने पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होईल. याबरोबरच पाण्याखालील जीवनसृष्टीबद्दलही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. ही जागरूकता मुख्यत: चित्रपट आणि संवादात्मक सत्राच्या माध्यमातून होईल’, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.
‘जल साक्षरता याविषयाशी संबंधीत धोरणे, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आदी अनेक बाबी या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. यामध्ये प्रत्येक सत्रात ३० मिनीटांचा लघुपट व त्या विषयावर आधारित तज्ज्ञ , चित्रपट निर्माते, अभ्यासक यांच्याशी संवाद असे सत्रांचे स्वरूप असणार आहे. याबरोबर अनेक चर्चासत्रांचे आयोजनदेखील या दरम्यान करण्यात येणार आहे. या महोत्सवात व्याख्याने व चर्चासत्रांबरोबर जल साक्षरतेचा संदेश देणाऱ्या प्रतिकृती, चित्राकृती यांचादेखील समावेश असेल’, अशी माहिती प्रफुल्ल तलेरा यांनी दिली.